तिने विचारलं, "कसला विचार चालू आहे रे? मनात ठेवू नको. सांग ना."
तो सहज म्हणून गेला, "तुझाच विचार चालू आहे."
"काय?"
"तुझी आठवण!"
"अं..."
"तुला नाही का गं येत माझी आठवण?"
"येते रे. खूप येते. पण मी बोलून दाखवलं तर अजूनच miss करशील मला!"
"हो गं. पण आपली भेट?"
"लवकरच."
"नुसती आशा की खात्री?"
"खात्री!"
"एवढी खात्री कुठून येते?"
"आपल्या प्रेमावर विश्वास आहे. त्यामुळे खात्री असतेच. कामानिमित्त आत्ता एकमेकांपासून दूर असू तरी कामं आटोपताच पुन्हा भेट होईलच."
"पण या सखीचा विरह म्हणजे जीवाला फार त्रास."
"अरे काय कायमचा विरह थोडी आहे?"
"हो, पण थोडा विरह सुद्धा त्रास देतो."
"असू दे थोडा विरह."
"प्रेम अजून वाढतं म्हणशील."
"हो."
"ते माझं समाधान व्हावं आणि मी सारखं 'तू हवी' असं म्हणू नये म्हणून!"
ती गोड हसली आणि म्हणाली, "तुझं हे असं वागणं मला अजून तुझ्या प्रेमात पाडतं. मी कशाला हवी असते रे तुला?"
"कशाला म्हणजे?"
"बाकी किती जणी आहेत, असतील, मिळतील."
"असू दे."
"मग मीच का?"
"त्या मिळाल्या तरी त्यांच्यात मी तुलाच शोधीन."
"असं का?"
"असंच."
"सांग की रे."
"तुझं असणं खूप ऊबदार असतं. तुझ्या फक्त जवळ असण्याने वाटतं की हे सगळं जग किती सहज आहे, सोपं आहे. तू सोबत म्हणजे मज्जा. तू नाही तर..." (बोलता बोलता त्याचा गळा भरून आला.)
ती समजायचं ते समजली. एका शब्दाने बोलली नाही.
क्षणार्धात त्याच्या डोळ्यांतून अश्रू झरझर झरू लागले.
तिला समजलं. तिने अलगद विचारलं, "रडतोयस?"
तो रडतच म्हणाला, "मुलं कुठे रडतात का?"
ती म्हटली, "का बरं? का नाही रडायचं?"
तो बोलून गेला "पुरुषार्थाचा अपमान होतो म्हणे."
ती लागलीच म्हटली, "असं कोण म्हणतं? बिलकूल नाही. मुलीला बळाने रडवणं हा खरा पुरुषार्थाचा अपमान! तू तर स्वप्नात पण मला रडवायचा विचार करत नाहीस."
फोनवर पूर्ण एक मिनिट शांतता होती. त्या शांततेत दोघांचा संवाद झाला, निःशब्द! दोघे एकमेकांना दिसत नव्हते, तरी भावनांचं आदान-प्रदान होत होतं. तो भावनांना अडवत नव्हता. तो मोकळा होत होता.
मिनिटभर शांतता होती खरी. पण दोघांच्या मनात विचारांची चक्र फिरत होती. दोघांच्या अवघड क्षणांमध्ये दोघांनी एकमेकांना केलेला support त्यांना आठवत होता.
आत्ता दोघे प्रत्यक्ष एकत्र नसून सुद्धा दोघे एक होते. हे असं या क्षणी सोबत नसून पण 'एक' असण्याची भावना देणारं माणूस प्रत्येकाच्या आयुष्यात असणं फार महत्त्वाचं असतं हे जाणवत होतं.
आपल्याला क्षणोक्षणी judge करणार नाही असं माणूस. "आत्ता तुला असं का वाटतंय?" हे न विचारता जे वाटतंय ते समजून घेईल असं माणूस.
"तू चिंता करू नको. मी आहे!" इतकंच म्हणणारी व्यक्ती.
सगळं ठीक होईल असा विश्वास देणारी सोबत!
दुःखात सर्वात जास्त साथ करणारी व्यक्ती, ते आपलं माणूस.
आपल्या सुखाचा उत्सव साजरा करणारं माणूस.
मोकळा श्वास घेऊ देणारी सोबत.
मोकळं जगू पाहणारी आणि जगू देणारी साथ.
मन जाणणारी व्यक्ती.
हक्काने मनातलं सांगायला भाग पाडणारी व्यक्ती.
भर उन्हात वाऱ्याची झुळूक यावी तशी आल्हाददायक साथ.
फोनवरील शांततेचं एक मिनिट संपलं होतं. एक मिनिटात काय काय घडलं होतं. दोघांचं एक असणं दोघांना एकत्र धरून ठेवत होतं. दोघांना एकमेकांच्या मनातलं कळत होतं. न बोलता नातं अजूनच घट्ट होत होतं.
त्या अश्रूंच्या झरझर झरण्यामध्ये आणि या विचारात झरकन एक मिनिट सरलं.
तो तिच्यासाठी नि ती त्याच्यासाठी झुरत होती.
एकमेकांची आठवण आता थोडी हवंहवंसं छळत होती.
इतकं बोलून आता phone ची battery low होत होती.
पण "लवकरच भेटू सखी" या विश्वासावर दोघांच्या मनाची battery मात्र full charge झाली होती.
- वरुण भागवत

☺️
ReplyDeleteThanks!😊
Deleteकमाल👌
ReplyDeleteThank you! 😊
Delete