Skip to main content

काय बदललं? फक्त कॅलेंडर?


A click by: Sushil Ladkat


काय बदललं? फक्त कॅलेंडर!


रोजचा सूर्य तसाच उगवला आहे.

सुर्यास्तसुद्धा तसाच,

सकाळ तशीच आहे.

काय बदललं? फक्त कॅलेंडर!


गरमागरम चहानेच दिवसाची सुरूवात होत होती,

आजही तशीच होते आहे.

काहींचा आळसाने दिवस सुरू व्हायचा,

काहींचा उत्साहाने.

आजही तेच घडतंय.

मग काय बदललं? केवळ कॅलेंडर!


वर्तमानपत्रात काल बातम्याच आल्या होत्या,

आजही बातम्याच आल्या आहेत.

केवळ वर्तमानपत्रावरील तारीख बदलली, वर्ष बदललं.

काल ३१ तारीख होती, आज १.

दर महिन्यात असतं हे,

मग बदललं काय? फक्त कॅलेंडर!


आजूबाजूला असणारी माणसं तीच आहेत,

रोजची कामं तीच असणार आहेत.

काय बदललं? फक्त कॅलेंडर!


दिवस २४ तासांचाच राहिलाय,

कामाची वेळही तीच राहिलीय.

काय बदललं? फक्त कॅलेंडर!

.

.

कष्ट तितकेच आहेत,

त्यात काही बदल नाही.

रोजची काम तीच आहेत,

रुटीन तसंच आहे.

बदललं काय, केवळ कॅलेंडर!

.

.

सगळं खरंय, पण माणसाला काही ना काही बदल घडलाय किंवा घडेल (चांगला) हे वाटण्याची संधी आहे हे बदलणारं कॅलेंडर!

सूर्य तोच असला तरी उत्साह नवा आहे असं सांगतं हे कॅलेंडर!


कॅलेंडर फक्त बदलत नाही, जुनं जे नको आहे ते विसरुन पुढे जायला शिकवतं.


जे चांगलं घडून गेलं आहे त्याची आठवण आणि जाण ठेवायला लावतं.


माणसं,

ऑफिस,

व्यवसाय,

उद्योग,

उपक्रम,

काम

असं सगळं तेच आहे हे मान्य, पण नवं कॅलेंडर या सगळ्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला लावेल कदाचित!


हे कॅलेंडर नवी दिशा आणि नवा उत्साह देईल अशी आशा बाळगणारे आपण सामान्य जन. ही आशाच आपल्यातलं बळ टिकवते आणि वाढवते.


कॅलेंडर बदललं, बदलतं. हे होतच राहील.


पण अनेक गोष्टी शिकवतं आणि सुचवतं हे बदलणारं कॅलेंडर. ते कॅलेंडर सुचवत असलेल्या गोष्टी घ्यायच्या की नाही हे आपण ठरवायचं.

.

.

एका वर्षातून दुसऱ्या वर्षात आपण यशस्वीपणे पोहोचलो याची जाणीव करून देतं हे बदललेलं कॅलेंडर.


कधी वाटतं की कुठे काय ग्रेट केलं आपण सरत्या वर्षात? मग मनाला पटवतं हे नवं कॅलेंडर की अरे, तू मागच्या वर्षात सर्वाईव्ह झाला हे ही एक प्रकारचं यशच आहे.


नव्या वर्षाचं नवं स्वरूप बघायला लावतं हे बदललेलं कॅलेंडर.


नवे प्लॅन्स, संकल्प करायला प्रवृत्त करतं हे बदलणारं कॅलेंडर. (अमलात नाही आले तरी किमान डोक्याला चालना तरी द्यायला लावतं.)


नव्याने नवा विचार डोक्यात आणतं हे बदलू पाहणारं कॅलेंडर.

आपल्याला वाटतं आपणही कदाचित बदलू या कॅलेंडरसह, चांगल्या अर्थाने, ठरवलं तर!

.

.

कॅलेंडर बदलतं, एकदम बदलत नाही. त्यासाठी ३६५ दिवस लागतात. तेव्हा कुठे एकाने त्याची प्रगती होते. म्हणजेच तेव्हा कुठे २०२१ साल बदलून २०२२ होतं. हा दिसताना एवढासा बदल खरोखरी अमलात यायला कितीतरी वेळ जावा लागतो. म्हणूनच हे कॅलेंडर संयम शिकवून जातं. हे कॅलेंडर पुढे जाण्याचं बळ देऊन जातं.


हो, बदललं कॅलेंडर, पण फक्त बदललं नाही, पुढे गेलं आणि शिकवून गेलं की मी ही पुढे जाऊ शकतो, कणाकणाने!


- वरुण भागवत


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...