Skip to main content

आठवणी- हवेहवेसे त्रास

 

A click by: Varun Bhagwat



"आठवणी."

"त्यांचं काय?"

"या आठवणी आठवण्याची आणि साठवण्याची सवय लावून घेऊ नये."

"का लावून घेऊ नये?"

"त्रास देतात या आठवणी."


"अगं, याच आठवणी जगवतात.

याच आठवणी जगण्यात मजा आणतात.

याच आठवणी नव्या आठवणी तयार करण्याची प्रेरणा असतात.

आठवणीच तर असतात ज्या हलकेच सारं आठवून हसवतात."


"हो रे. खास व्यक्तींच्या बाबतीत तर हे घडतंच. काही व्यक्ती येतात आपल्या आयुष्यात. आपलं आयुष्य सुंदर आहे हे दाखवून देतात. त्या माणसांची सोबत हवीहवीशी वाटते. मग एक दिवस ती माणसं आपल्याला सोडून जातात. भांडून नाही. त्यांचा आपल्यासवे असणारा कार्यभाग संपतो इतकंच. ते पुढच्या प्रवासाला निघतात. त्यांचं काय करायचं? त्यांनाही जायचं नसतं. आपल्यालाही त्यांना सोडायचं नसतं. पण परिस्थितीच यांना एकमेकांपासून दूर लोटते."



"हो, पण परिस्थितीनेच तर त्यांना एकत्र आणलेलं असतं. वेगळं करणारी पण ती परिस्थितीच. जरी वेगळं केलं तरी त्या भेटीच्या काळात आपलं आयुष्य काही प्रमाणात समृद्ध होतं. या व्यक्ती शरीराने नेहमी सोबत नसल्या तरी आठवणींच्या रूपात आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून जातात. या व्यक्ती नि त्यांच्या या आठवणी म्हणजेच तर आपलं सुंदर जीवन."

"पण ही माणसं जाणार असतात तर येतायच कशाला?"

"ही माणसं आपल्या आयुष्यात येतात म्हणून तर यांच्या आठवणी होतात. या आठवणी म्हणजे तर जगण्याचा आधार."



"अरे पण याच आठवणींनी डोळे पाणावतात."



"कारण या आठवणी निर्माण होत असतात तेव्हा आपण ते क्षण खरे जगलेलो असतो. या आठवणी खूप काही आठवायला लावतात. ते स्पर्श, ते प्रेम, ती माया, नात्यात निर्माण झालेला तो ओलावा, तो आपलेपणा, पोट दुखेपर्यंत हसणं, पूर्ण वेळ एकमेकांसवे राहणं, एकमेकांना काय हवं नको ते पाहणं. या साऱ्याचं सार म्हणून या आठवणी कधी डोळ्यांत हलकेच पाणी आणतात. आपण ते अश्रू पुसू लागतो तोच कोणाची तरी पाठीवर थाप पडते. ती व्यक्ती विचारते काय झालं?

आपण आपल्यातच असतो, आपण पापण्यांची कड पुसत म्हणून जातो की काही नाही झालं. आपण पुन्हा आपल्यात रमतो."

"हो रे. खरंच. या आठवणी काय काय करतात?"

"अगं, या आठवणीच तर असतात ज्या सगळं सरलं तरी उरतात. सरणावर जाण्याआधी सुद्धा बाकी असतात त्या आठवणी. आणि तू म्हणतेस आठवणी त्रास देतात."



"हो देतात."

"अगं.."

"खरंच आहे हे."

"पण.."

"अरे पूर्ण ऐक तर."

"हां बोल"

"अरे आठवणी त्रास देतात.  पण काही त्रासच हवेहवेसे असतात. नाही का?"


- वरुण भागवत


Comments

  1. Hats off!👏👏👏
    I just read the whole two times and I want to read it again❤️🙏....it's amazing, beautiful,deep and connects to my heart so well!
    Really awesome varun dada!
    Keep coming🥰
    -Your little sister.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...