![]() |
| A click by: Varun Bhagwat |
कधी पाहिलंय का की पांडुरंगाचा टिळा आणि Google maps च्या app चा symbol हा जवळजवळ सारखा आहे. मी निरीक्षण करत बसलो आणि लक्षात आलं की बरोबर. दोघेही अंतिमतः पोहोचण्याचं ठिकाण अर्थात final destination सांगतात. Google map आपल्याला इप्सित स्थळी पोहोचवतो आणि पांडुरंगाचा तो टिळा (नाम) हे दर्शवतो की इथे पोहोचायचय.
Google map रस्ता दाखवतो. पांडुरंग मात्र म्हणतो की रस्ता तुम्ही शोधा. मात्र तिथपर्यंत पोहोचण्याचं गमक मात्र तो सांगतो. प्रत्येकाचे रस्ते भिन्न असतील. मात्र प्रत्येकाच्या रस्त्यात मधे मधे सतत stops लागतील. त्या stops चं नाव असेल कर्म. एका कर्माची रेषा हिरवी तर दुसऱ्याची लाल असेल. हिरवा रंग म्हणजे चांगलं कर्म. लाल म्हणजे कुकर्म. हिरवं कर्म निवडायचं यासाठीची बुध्दी पांडुरंग आपल्याला देतो, ती वापरायचं काम आपलं. नाहीतर लाल रंगाच्या कर्माच्या traffic jam मधे आपण फसतो आणि काही केल्या त्यातून बाहेर पडता येत नाही. Choice आपल्या हातात दिलाय. योग्य निवड करत जात राहायचं.
रस्ता कधी कच्चा असतो, कधी पक्का.
कधी चढ तर कधी उतार.
कधी खड्डे तर कधी एकदम सुबक रस्ता.
कधी सरळ तर कधी वळणावळणाचा रस्ता.
कधी त्रास असेल तर कधी आरामात drive करता येईल.
कधी first gear तर कधी मस्त fifth gear वर जाता येईल.
कधी डोंगरदऱ्यांचा, हिरवळीचा सहवास असेल. अर्थात सगळं काही अलबेल असेल. तर कधी ओसाड माळरान अर्थात त्रासदायक काळ असेल. .
कधी काही रस्ते आवडतील, काही आवडणार नाहीत. पण प्रवासाचा भाग म्हणून पूर्ण करावे लागतील. हां, पण तिथेही choice मिळताच योग्य choice ची निवड करणं हे driver चं म्हणजेच आपलं कौशल्य.
कधी आपण रस्त्याचा हात पकडू, कधी तो आपला हात पकडेल, अर्थात कधी आयुष्य आपल्याला नेत राहील, कधी आपण आयुष्याला सांगू, चल आज या दिशेने जाऊ.
ज्याप्रमाणे रस्त्यात कधी गाडी बदलावी लागते त्याप्रमाणे आयुष्यात वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात.
कधी पायी चालावं लागतं त्याप्रमाणे जीवनात खडतर मार्ग अवलंबावा लागतो.
या जगात आपण सारेच मुसाफिर. भटकत असतो. रस्ता असतो. चालत राहतो. हवेसंग डोलत असतो. प्रवास आहे. आनंद घेत असतो. आनंद घेत नाही आहोत असं जाणवत असेल तर क्षणभर थांबून एकदा विचार करायचा आणि स्वतःला विचारायचं की प्रवासात मजा येते आहे ना?
कारण नीट विचार केला की कळतं की इथे destination महत्त्वाचं आहे पण प्रवास जास्त महत्त्वाचा आहे. याचं मुख्य कारण हेच की एकदा destination आलं की story संपेल. शेवटाची घाई कशाला? तो शेवट सुंदर व्हावा यासाठी प्रयत्न नक्कीच करू शकतो.
तेच तर करायचंय. प्रवास उत्तम करायचा आहे. ऊन, सावली, पाऊस, वारा सगळं लागणार आहेच. पण आयुष्याची वारी अथक पूर्ण करायची. तिही शक्य तिथे, शक्य तेव्हा, शक्य तेवढा, शक्य तेवढ्या साऱ्यांना आनंद देत.
कारण माउलींनी म्हटलंच आहे,
अवघाचि संसार सुखाचा करीन |
आनंदें भरीन तिन्ही लोक ||
जाईन गे माये तया पंढरपुरा |
भेटेन माहेरा आपुलिया ||
Destination तर set आहे. प्रवास उत्तम आणि आनंदी करणं आपल्याच हाती.
- वरुण भागवत

Comments
Post a Comment