Skip to main content

शब्द (कोणता नि कसा?)




शब्द बोलला. बोलून गेला.

मग जाणवलं, चुकला. 

का बोलला? उगाच बोलला. 


खरंतर बोलण्यासाठीच असतात शब्द. पण शब्द चुकले तर मनं दुखावण्याचं काम करतात. माणूस कोणाला तरी वाट्टेल ते बोलून जातो. नंतर पश्चात्ताप करायची वेळ येते. 


शब्द शस्त्र आहे. त्यांना धार असते. 

कधी कधी ठरवून वार होतो,

कधी चुकून वार होतो.


कधी कठोर शब्द वापरावे लागतात.

कधी नकळत वापरले जातात. 


याच्याच जोडीला चांगले शब्दही आहेत, जे मनांना जोडतात. अगदी सहज एकत्र आणतात.


शब्दांची गुंफण करून प्रेम दर्शवता येतं.

हेच शब्द एकत्र करून राग व्यक्त होतो. 


शब्द नकळत घाव घालतात.

हेच शब्द घाव भरून काढतात. 


शब्द ओले, शब्द कोरडे.

शब्द शहाणे, शब्द वेडे.


शब्द जोडले तर वाक्य.

वाक्य जोडत अर्थपूर्ण संवाद.

संवाद एकतर बरा किंवा वाईट.

संवाद माणसाला जोडतो, अथवा तोडतो.


शब्दाची ताकद मोठी असते.

ती ताकद एखादी गोष्ट घडवत किंवा बिघडवत असते. 


शब्दांना बांध घालून अडवायचं काम खरंतर शब्दच करू शकतात.


अमितच्या बाबतीत असंच घडलं जेव्हा तो अशांत आणि अस्वस्थ झाला होता. त्याच्या तोंडून चुकून त्याच्याच मित्राविषयी चुकीचे शब्द निघाले. अमित त्याला खूप बोलला. त्यातले बरेच शब्द मित्राला दुखावणारे होते. त्यावेळी अमितला ते जाणवलं नाही. तावातावात तो बोलून गेला. मित्राला अकारण बरंच सुनावून गेला.


सगळं घडून गेलं,

बोलायचं ते बोलून झालं,

चुकायचं ते चुकून झालं,

रात्री जरा मन ताळ्यावर आलं.


तेव्हा अमित शांत झाला होता. पण मित्र मात्र दुखावला गेला होता . हे त्याला आत्ता जाणवत होतं. अमित पुन्हा अशांत,अस्वस्थ झाला. पण या वेळी कारण वेगळं होतं. मित्राला बोलायचं म्हणून नाही, मित्राला वाईट बोललो हे आठवून हा अस्वस्थपणा आला. 


बोललोच नसतो तर बरं झालं असतं. जिभेवर ताबा नाही. का बोललो? मात्र या जर तरच्या गोष्टीला आता अर्थ नव्हता. 


मित्राला फोन करावा की मेसेज करावा या विचारात अमित होता. अचानक त्याच्या डोक्यात काय आलं कोणास ठाऊक... तो गाडी घेऊन निघाला. थेट मित्राच्या घरी जाऊन पोचला. 


बेल वाजली. मित्रानेच दार उघडलं. इतक्या वेळ शब्दामुळे घडलेल्या चकमकीत आता शब्द नव्हते. मित्र काही बोलत नव्हता. हेच अमितला जास्त त्रासदायक वाटत होतं. अमित देखील त्या क्षणी काही बोलला नाही. मात्र त्याने मित्राला कडकडून मिठी मारली. मिठीत केवळ एक शब्द उच्चारला, "सॉरी." तो ही मनापासून...


मनापासून उच्चारला असं मुद्दाम नमूद करावं लागलं कारण 'सॉरी' हा शब्द देखील अनेकदा माणसं उपकार केल्यासारखा वापरतात. 


त्या मिठीत, त्या सॉरी मध्ये नातं टिकवून ठेवण्याची क्षमता होती. इथे जाणवलं, शब्दाची गंमत आहे. तो केवळ काय बोलला हे महत्त्वाचं नाही. कसा बोलला हे ही महत्त्वाचं. शब्द केवळ वापरायचा नाही, प्रामाणिकपणे, खरा खरा न्याय देत उपयोगात आणायचा. शब्द जगायचा!


- वरुण भागवत

Comments

  1. Kiti chan lihitos Varun... Khupach bhari aa..... Khup khup shubheccha asach shabdha lihit raha .... 😍😍👌👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...