Skip to main content

पक्षी उडाला आकाशी...


A click by Sushil Ladkat



नावेत बसलो होतो. वल्हवताना होईल तेवढाच पाण्याचा आवाज होता... बाकी निरव शांतता. पाण्यात मध्यभागी एक झाड उगवलं होतं, झाडाच्या सगळ्यात वरच्या फांदीवर एक सुंदर पक्षी बसला होता. मी तो पक्षी बघत होतो.


फांदीसारखी फांदी ती, एकदम हलकी. त्या फांदीसोबत हा डुलत होता. मला जाणवलं आपण हे पुस्तकात वाचलं होतं की पक्ष्याचा आपल्या पंखांवर विश्वास असतो आणि आज प्रत्यक्ष अनुभवलं. याला भीती नव्हती फांदी तुटण्याची आणि आपण पडण्याची!


आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं जाणवलं. भौतिक गोष्टींमुळे येणारी safety आणि comfort zone यात मी किती अडकतो असं वाटलं. माझं घर (कदाचित वडिलोपार्जित, कदाचित मिळवलेलं, कदाचित भविष्यातलं), माझी गाडी, माझे savings नसतील तर माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही असाच मी समज करून घेतो.


डोक्यावर निवारा नसेल हा विचार मला घाबरवून सोडतो. मी जमवलेल्या माझ्या वस्तू जीवाहून जास्त जपतो. हे सगळं आहे तसं ठेवण्यात आणि जपण्यात मी माझा पूर्ण वेळ खर्च करतो. हे सगळं करण्याचं कारण म्हणजे मला कायम या भौतिक गोष्टींचा आधार असावा ज्याने मी सुरक्षित (?) राहीन असं मला वाटतं. मी असा विचारच करत नाही किंवा असा विचार करायला घाबरतो की हे सगळं जर कधी भविष्यात काही कारणांमुळे राहिलं नाही तर मी survive कसं करेन?



नाही, नाही! असं कुठं असतं का? असं का होईल माझ्या बाबतीत.. असं म्हणत मी तो विचार झटकतो. तेवढ्यात त्या पक्षाने त्याचे पंख झटकले. फांदी थोडीशी वाकली. पक्षी डगमगला नाही. त्याने चहूबाजूला एक नजर टाकली. फांदी थोडी अजून वाकली. त्याने फांदीचा अंत बघितला नाही. पंख पसरले आणि..

त्याने भरारी मारली, इकडे काडकन फांदी तुटली. फांदी पाण्यात पडली, तिचं अस्तित्व संपलं त्याचं कोणाला काहीच वाटलं नाही.लक्ष पक्ष्याकडे गेलं.



पक्ष्याने शाळेत पुस्तकात शिकलेल्या धड्याला प्रत्यक्षात उतरवलं. फांदी फक्त आधारासाठी.. ती कधीही तुटू शकते. तिच्यात अडकायचं नाही. एखाद्या फांदीने जास्त साथ दिली तर उत्तम पण ती सुद्धा एक दिवस तुटेल. त्यामुळे पंखांना विसरायचं नाही. आणिअशा कितीही फांद्या तुटल्या आणि पडतोय अशी वेळ आली तरी पंखांवरचा विश्वास गमवायचा नाही.

त्या पक्ष्याने माझ्या मनाला वल्हवत वेगळ्याच विचारांच्या किनाऱ्यावर आणून सोडलं. या नौकाविहारात पक्षाने फांदीचा आधार सोडला होता आणि मी जुना किनारा (सोडायच्या प्रयत्नांत होतो).



वरती पाहिलं. तो अजूनच उंच उडत होता. आता आधारासाठी अजून उंच झाड शोधात होता. पुन्हा आधार म्हणालो का मी? सवय लागलीये ना.. मग नीट पाहिलं. आधार कसला..

पंखांच्या बळावर 

उंsssssssssच

गगनभरारी घेण्यासाठी

पक्षी उडाला आकाशी......


-वरुण भागवत

Comments

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...