Skip to main content

सल्लागार

 

A click by Varun Bhagwat



ला फार गंमत वाटते न मागता सल्ले देणाऱ्या लोकांची.

मला नको असेल यांचा सल्ला तर म्हणतात तुझ्या भल्यासाठी आहे हे!


त्यांना म्हणावसं वाटतं की अहो तुम्ही कसं काय ठरवलं की माझं भलं कशात आहे ते! सटवाई ने ५व्या दिवशीच माझं नशीब लिहून ठेवलंय. ते तुमच्या सल्ल्याने बदलेल का? नशीबाचं जाऊ द्या. सल्ला दिला इथवर ठीक! तो ऐकलाच पाहिजे हा यांचा अट्टाहास! यांच्या मते, यांच्या सल्ल्याने काहीतरी revolutionary म्हणजेच क्रांतिकारी बदल होणार असतो आपल्या आयुष्यात.


योग्य माणसाने, योग्य ठिकाणी, योग्य टप्प्यावर, योग्य वेळी योग्य सल्ला देणं आणि आपण तो घेणं या साठी त्या योग्य level चं नातं असावं लागतं. तरच सल्ला देणाऱ्याचा मान राहतो आणि घेणाऱ्याला कदाचित सल्ल्याचा फायदा होतो.


पण यातली ही जी उगाच सल्ला देणारी माणसं असतात, त्यांना एकतर त्यांचं सगळं सांभाळून ही सोशल सर्व्हिस (?) करायला वेळ झालेला असतो किंवा स्वतःचं झाकण्यासाठी हे सल्लागार नावाचा पार्ट टाइम जॉब (बिनपगारी) करतात किंवा यांना मुळातच हौस असते दुसऱ्याचं डोकावून पाहण्याची. याचा अर्थ यांचं काही फार बरं चाललेलं असतं असा नाही. पण कोणावर तरी वरचष्मा दाखवायला मिळतो याचा आनंद (?) त्यांना मिळतो. पोट भरलेला माणूस अर्धपोटी माणसाला उत्तम सल्ले देतो पण तो काही त्या अर्धपोटी माणसाचं पोट भरत नाही आणि चुकून त्याच्यावर तशी परिस्थिती आली तर दुसऱ्याला दिलेल्या सल्ल्यानुसार तो स्वतः वागेलच असंही नाही.


बरं, अनेकदा तर सल्ला देणारा आपण दिलेला सल्ला विसरूनही जातो पण जो त्याचा सल्ला घेतो तो मात्र बिचारा त्यावर बरीच काथ्याकूट करत बसतो. अनेकदा काही निष्पन्न होतंच असं नाही.


एखाद्या गोष्टीविषयी, माणसाविषयी, परिस्थितीविषयी पूर्णपणे माहिती नसताना उगाच सल्ला देऊ नये असा मला यांना सल्ला द्यावासा वाटतो. बघा, बोलता बोलता मी पण सल्ला देण्याची भाषा केलीच! कोणीही न मागता! आपल्याकडे problem च आहे हा.. सवय लागल्यासारखं न मागता सल्ले देणं!


या सल्लागारांना म्हणावं वाटतं, अहो ऐका ना! नकोय तुमचा सल्ला..बरं चाललंय की आमचं! बघवत नाहीये की त्रास होतोय???

पण असं कसं म्हणणार?

वयाचं भान राखावं लागतं,मानापमान जपावे लागतात.. नाहीतर यांना त्याचाही राग.. बोलायची पद्धत नाही असं म्हणत आमच्या आईबापांना नावं ठेवतात आणि यातले काही काही जण तर मी कशा पद्धतीने त्यांना react झालो, ते कसं चुकलं आणि ते कसं सुधारता येईल हा सल्ला आमच्या आईबापाला देतात.


उगाचच आपल्या आईबापाला काही सल्ला देऊ नये, समाजाचा balance (?) बिघडू नये  आणि नातेसंबंधांना गालबोट लागू नये आणि ultimately त्यामुळे आपल्या मनाचा balance बिघडू नये म्हणून आपण यांचे सल्ले ऐकतो आणि या सल्लागारांना शहाण्यालाही वेडं करायची ताकद बहाल करतो. आपल्या मनाचा balance खरंतर हे बिघडवत असतात पण यांच्या मते हे एक महत्वपूर्ण सल्ला देत असतात.


-वरुण भागवत



Comments

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...