Skip to main content

शांत, निवांत, मनातलं!

 

A click by Varun Bhagwat

एका शांत, निवांत स्थळी मी जाऊन बसलो. एकदम जाणवलं की ही शांतता किती गरजेची होती आणि कितीतरी दिवसापासून हवीशी होती. मिळालं नाही की त्या गोष्टीचं महत्त्व जास्त समजतं हा मनुष्यस्वभाव वेळोवेळी दिसतो.


आपण शांतता शोधतो, ती शोधेपर्यंत किती कल्लोळातून जावं लागतं. किती कोलाहल, दंगा, गडबड, गोंधळ चालू असतो आणि या दिव्यातून पार झालं की मग लाभते शांतता. या सगळ्यातून न जाताच शांतता मिळेलही पण मग आत्ता जितकं जाणवतंय तितकं त्या शांततेचं महत्त्व जाणवणार नाही, समजणार नाही.


माणूस एक अजब प्रकार आहे. फार शांतता झाली तरी सुन्न पडतो. काय करावं समजत नाही. सारखा समतोल हवा असतो. आयुष्यात इतका जर समतोल असता तर आयुष्याची रेषा (ECG) सरळच राहिली असती. पण असं चालणार नाही. ती रेष सरळ झाली की विषयच संपला.


चढ आहे म्हणून उताराचं महत्त्व आहे आणि उतार आहे म्हणून चढाला किंमत आहे आणि तो चढ चढून वर जायला पण फार किंमत मोजावी लागते, वेगवेगळ्या प्रकारे.


या शांततेच्या महत्त्वाचा शोध घेताना कितीतरी गोष्टी शोधल्या जातात. आपला आपल्याला श्वासोच्छ्वास ऐकू आला की कळतं आपण आहोत. हा श्वास आपलं जिवंत असणं अधोरेखित करतोय. जसं 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटातला इम्रान आपल्या एका कवितेचा शेवट करताना म्हणतो, "सिर्फ मैं हूं, मेरी सांसे है और मेरी धडकने…. मुझे अपने होने पे यकीन आ गया।"


आपण आहोत, आपण म्हणजे मी एक व्यक्ती आहे. माझ्यासारखा दुसरा नाही. त्या दुसऱ्यासारखा तिसरा नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळी. परमेश्वराने निर्माण केलेल्या या जगात प्रत्येकाचं स्वत:चं असं स्वतंत्र जग आहे. नसेल तर ते त्याला निर्माण करायचंय. स्वतःचं अस्तित्त्व निर्माण करायचंय. स्वतःची ओळख निर्माण करायची आहे.


नवनिर्मिती हा मनुष्याचा सहजभाव आहे. त्यासाठी अर्थात आपल्याला असं काही नवं आणि स्वतःचं काही सर्जनशील निर्माण करावं वाटतं. तेव्हा कळतं की यासाठी हा शांतपणा, एकटेपणा गरजेचा असतो. तेव्हाच तो खरा वेळ मिळतो जाणून घ्यायला की मला नेमकं काय हवं आहे आणि मग सुरू होतो शोध. हा शोध आणि हा प्रवास थरारक बनत जातो. आपण आपलं एक सुंदरसं जग निर्माण करू पाहतो.


हे सर्व आपण करत राहतो आणि एका क्षणी ध्यानात येतं की आपलं जग सगळ्यांच्या ध्यानात येईलच असं नाही. पण आपलं जग आपलं असतं. कोणी डोकावलंच आपल्या जगात तर ते सुंदर असावं असं प्रत्येकाला वाटतंच. बाकी कोण राहू दे, वेळ मिळाला की या निर्मिलेल्या जगात आपण आपलंच स्वतः डोकावलं तरी ते समाधान देणारं असावं.

शांत, निवांत आणि मनातलं असावं!


- वरुण भागवत

Comments

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...