Skip to main content

राग आल्यावर काय करायचं?

 

A click by: Sushil Ladkat

दिनेश तणतणत घरातून बाहेर आला. त्याचा भाऊ जयेश जवळजवळ त्याला जबरदस्तीच बाहेर घेऊन आला होता. अजूनही दिनेशचा राग काही शांत होत नव्हता.

"अती होतंय हे!" दिनेश तिरिमिरीत म्हणाला.
"काहीच अती झालं नाहीये."
"अरे काय आहे हे? आत्ता वाटलं होतं की माझा पोरगा आता हाताशी आला आहे. पण ह्याला कशाची फिकीरच नाही."
"आज असं काय झालं की तू इतका भडकलास?"
"अरे पोरीसोबत पाहिलं मी ह्याला."
जयेश म्हणाला, "एवढंच ना?"
"एवढंच काय?"
"आपण नाही केलं का त्याच्या वयात असताना सगळं?"
"हो केलं पण..."
"ऐक... मला कळतंय की या सोबतच त्याला परिस्थितीची जाणीव असावी."
"कळतंय ना?"
"अर्थात!"
"मग मला आत्ता काहीच का बोलू दिलं नाहीस?"
"आत्ता पाणी फार गढूळ झालंय रे. नंतर बोलू त्याला आपण."
"कसलं पाणी जयेश दादा?"
"चल जरा एक चक्कर मारून येऊ."

दोघे शांत रस्त्यावर पायीच फेरी मारत होते.

थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. दिनेश स्वतःहूनच काहीतरी आठवत म्हणाला, "दादा, मगाशी काय म्हणत होतास पाणी गढूळ आहे."
जयेश हसत म्हणाला, "अरे ती गौतम बुद्धांची गोष्ट आठवली."
"सांग ना."
"अरे मध्ये वाचनात आली. जशीच्या तशी आठवत नाहीये."
"तुला आठवेल तशी सांग."
जयेश सांगू लागला, "एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यासोबत जात होते. त्यांना तहान लागली. ते आपल्या शिष्याला म्हणाले की मागे काही अंतरावर आपल्याला ओढा लागला. त्याचं थोडं पाणी घेऊन ये. पुढे म्हणाले की फार स्वच्छ पाणी होतं नाही त्याचं? होय होय असं म्हणत शिष्य धावतच गेला. जाताना स्वच्छ दिसणारं ओढ्याचं पाणी आत्ता मात्र गढूळ झालं होतं. जवळच्या शेतातले बैल तिथून जोरात धावत गेल्याने पालापाचोळा, माती पाण्यात मिसळून सगळं पाणी गढूळ झालं होतं. शिष्य परतला आणि त्याने हकीकत ऐकवली. पुढे जाऊन त्याने हे ही सुचवलं की इथून पुढे जवळ नदी आहे तिथे पाणी पिऊ. गौतम बुद्ध म्हणाले की त्यांना इथलंच अर्थात ओढ्याचंच पाणी हवं आहे. नाईलाजाने शिष्य परत गेला. या सगळ्यात थोडा वेळ गेल्याने पाणी पुन्हा शांत आणि वाहतं झालं होतं. पालापाचोळा नव्हता, माती खाली बसली होती. तळ दिसत होता. पाणी स्वच्छ होतं." दिनेशच्या हावभावांचा अंदाज घेत जयेश पुढे म्हणाला, "कारण थोडा वेळ गेल्याने सगळं निवळलं होतं."
दिनेश काही बोलला नाही.

जयेश संधी साधत म्हणाला, "चला, आता परत जायला हरकत नाही. चांगला ओरडा दिला पाहिजे तुझ्या पोराला! काय म्हणतोस? मीच ओरडतो त्याला."
समजायचं ते समजत दिनेश म्हणाला, "कसलं काय दादा, आता निवळलं सगळं."
"म्हणूनच परत जायचं, कारण आता संवादसुद्धा विशुद्ध होईल, त्या पाण्यासारखा! आता वाद नसेल, तू त्याला समजावण्याचा आणि त्याने समजून घेण्याचा एक प्रयत्न असेल. तुम्ही दोघे एकमेकांना समजून घ्याल अशी परिस्थिती असेल. अरे त्याने मुलीसोबत फिरणं यात गैर काही नाही; हां पण जोडीला जबाबदारीने पण वागावं ही तुझी अपेक्षाही गैर नाही."
"दादा, कसं जमवतोस हे?"
"त्यात काय आहे? जरा निवळू देत जा. तुम्ही दोघेच आहात एकमेकांसाठी! इतकंही कोणाचं चुकलेलं नसतं रे.. "
"हं."
"हं नाही.. चल."
"चला."
"राग आल्यावर थांबत जा. त्या क्षणी सगळं गढूळ असतं बघ. एकदा निवळलं की एकमेकांच्या मनाचा पण तळ शोधता येईल इतकं स्वच्छ होऊन जातं चित्र!"

- वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...