Skip to main content

कृष्ण आणि कर्माचं महत्त्व!

 

A click by Varun Bhagwat


रात्री बाराची वेळ, एरवी किर्रर्र शांतता असणारा क्षण, मात्र हा दिवस वेगळंच काहीतरी मनात घेऊन आला होता. बाहेर धुवाधार पाऊस, आत कारागृहात बंदिवान होते देवकी आणि वसुदेव. या कारागृहातच इलुशा देवकीनंदनचा जन्म झाला नि अवघं जग कृष्णमय झालं.  कृष्ण आणि त्याचं कार्य दुनियेला ठाऊक आहे. त्याच्या चातुर्याचे, शांत प्रवृत्तीचे, कर्माचे दाखले जगभर दिले जातात. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी ज्याला कृष्णाने मात्र महत्त्व दिलं नाही ती म्हणजे त्याचं जन्मस्थळ. गंमत अशी की खरंतर कारागृहात याचा जन्म झाला, पण म्हणून ती जागा हे त्याचं भवितव्य ठरलं नाही. कृष्णाने त्याचं भवितव्य स्वतः घडवलं. नशिबाला दोष देत त्याने आयुष्याच्या गाडीला अडसर आणला नाही. 


परिस्थिती प्रत्येकाची निराळी असते. काही व्यक्ती सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात पण म्हणून ते सर्वस्व प्राप्त करतीलच असं नाही. काही जण शून्यातून विश्व उभं करण्याची चुणूक आणि धमक दाखवतात. काही जण सर्व असूनही उतमात न करता आपलं काम करत राहतात. काही जण असलेल्या गोष्टी स्वतःच्याच कर्माने घालवतात. 


या सगळ्यात एक समान दुवा असा की हे जे सर्व घडतं ते 'कर्माने' घडतं. कर्म या गोष्टीला पाठिंबा द्यायला कृष्णासारखा पाठीराखा नाही. कृष्णमय होताना हे जाणवतं की आपण कुठे जन्माला आलो या पेक्षा आपण जगाचा निरोप घेताना या दुनियेला काय देऊन गेलो किंवा काय कर्म करून गेलो हे महत्त्वाचं. कारण कर्म ही गोष्ट आपल्या हातातली आहे. जन्म कुठे, कसा आणि कधी होईल हे हातात नाही. मृत्यू वर माणसाचं नियंत्रण नाही. हे दोन्ही निसर्गदत्त. मधला प्रवास निसर्ग आणि दत्त शोधण्याचा. कसा? तर कर्म करत. कर्म आणि कष्ट यांना अनन्यसाधारण महत्त्व देणाऱ्या कृष्णाने तर फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा असं सांगितलं. अवघड परिस्थितीतून मार्ग काढताना सुद्धा दुसऱ्यावर नुसतं विसंबून राहून गोष्टी आपोआप घडत नाहीत. स्वतः कष्ट करावे लागतात. कार्यरत राहणं गरजेचं असतं. 


माणसाचं एकदम त्राण निघून जातं. वाटतं, आता काही जमणार नाही. पण थोडं थांबून पुन्हा प्रयत्नशील राहणं आपल्याला यशाकडे नेतं. 


करत राहणाऱ्याला नशीब सुद्धा साथ देतं असं म्हणतात. पण रडत बसून, नशिबाला दोष देत घडत काही नाही. मनगटात ताकद नसेल तर मिळवावी. मिळवली की मग तिचा सदुपयोग करत कर्म करत राहावं. बसल्याजागी सहजा सहजी कोणालाच काही मिळत नाही, मिळालंच तरी ते टिकत नाही. कष्टाने मिळवलेलं चाखायला सुद्धा मजा येते.


आपण आत्ता या क्षणी कुठे आहोत यावरून आपण कोण आहोत हे ठरत नाही. आपण कुठे पोहोचण्याचा विचार करतो आणि त्या दृष्टीने पावलं उचलतो ते खरे आपण!


  • वरुण भागवत

Comments

  1. कर्मयोग गीतेचा तिसरा अध्याय बरोबर सांगितलंस

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...