मी कसा लिहितो नि काय लिहितो याहीपेक्षा जेव्हा मी लिहितो तेव्हा स्वतःच्या विश्वात रमलेला असतो. आता इतक्यात काय झालं कुणास ठाऊक? अचानक इतके बदल झाले की मी practically, कुठल्यातरी तिसऱ्याच विश्वात सध्या आहे. त्यामुळे या लेखनविश्वात रमायला मला वेळ होत नाही. की मी वेळ काढत नाही? कसंही असलं तरी वेळ नाही असं म्हणून कसं चालेल? जिथे मन रमवायला आवडतं तिथे वेळ काढायला हवा. त्या विश्वात मी किती वेळ राहतो नि किती उत्तम लिहितो हे तितकं महत्त्वाचं नाही. ते रमणं महत्त्वाचं, ते रममाण होणं महत्त्वाचं! भान हरपून त्यात शिरणं महत्त्वाचं! एका शांत स्थळी जाऊन लिहावं ही इच्छा अनेकांची असते. फक्त लिहिणं असं नाही तर निरनिराळ्या छंदांसाठी कोणाकोणाला कुठे कुठे जायचं असतं. आता एका प्रकारे काही प्रमाणात शांत ठिकाणी आलोय, तर मन अशांत आहे की काय असं जाणवू लागलंय. मन स्थिर केलं तर परिस्थिती अस्थिर वाटते. ते ही मनाचंच आहे म्हणा. हे सगळं घडण्यात दोष कसलाच नाही, कोणाचाच नाही. सगळं जेव्हा नेहमीसारखं चालू असतं तेव्हा एका प्रकारे आपण त्या रोजच्या दिवसाशी set झालेलो असतो. पण जेव्हा बदल घडतो तेव्हा अनेक गोष्टी बदलतात. असा बदल...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...