Skip to main content

चमत्कार

A Click By: Varun Bhagwat


"कधी ऐकलंय का की सशाने सिंहाची शिकार केलीये?

गाय बिनधास्तपणे वाघाच्या समोरून चाललीये?" शिक्षक मुलांशी बोलत होते. हे ऐकून मुलं हसू लागली. "असं कसं होईल सर?" एक मुलगा सरांना म्हणाला, "आम्ही नाही ऐकलं असं काही!"

"नाही ऐकलं ना... कारण अशी गोष्ट एखादा चमत्कार झाला तरच शक्य आहे." शिक्षक मुलांना सांगत होते, "मुलांनो, चमत्कार करणं कोणाच्या हातात आहे?"

"आपल्या तर हातात नाही बुवा." अलका म्हणाली.

"खरंच?" सरांनी प्रश्न केला.

"कसं शक्य आहे सर आपल्याला?? आपल्याकडे काय जादू आहे की काय?" बाकी मुलांनी पण अलकाच्या बोलण्याला दुजोरा दिला.


सर हसले आणि म्हणाले, "हो आपल्याकडे जादूच आहे. मनात आणलं तर ती जादू वापरून काहीही करणं शक्य आहे. पण त्यासाठी आपला आपल्यावर विश्वास हवा."

मुलं प्रश्नार्थक नजरेने सरांकडे पाहत होती.


सर सांगू लागले, "एकदा एका छोट्या पक्ष्याने समुद्रकिनारी अंडी दिली. काही वेळातच भरती आली आणि समुद्राने त्या पक्ष्याची अंडी स्वतःच्या पोटात घातली. पक्ष्याला फार वाईट वाटलं. आधी त्याने समुद्राला विनंती केली की अंडी परत कर म्हणून. पण समुद्राला आपल्या शक्तीचा गर्व झाला. त्याने विनंती फेटाळून लावली. पक्ष्याने समुद्राला सांगितलं की तू जर माझी अंडी दिली नाहीस तर मी तुला पूर्ण कोरडा करेन."

हे ऐकून वैभव हसला आणि म्हणाला, "कसं शक्य आहे?"


सर म्हणाले, "अजून गोष्ट संपलेली नाही. समुद्र सुद्धा त्या पक्ष्याचं बोलणं ऐकून तुमच्यासारखाच हसला. पण पक्ष्याने निश्चय केला. त्याला त्याची अंडी हवी होती. तो समुद्रातला एक एक थेंब चोचीने उचलून बाहेर टाकू लागला. पक्ष्याचा साथीदारसुद्धा त्याची सोबत करू लागला. ही बातमी हळूहळू समस्त पक्ष्यांपर्यंत पोचली. पक्ष्यांचा राजा गरुड याने फर्मान काढलं की आपण त्याची मदत करूया. त्या बिचाऱ्या पक्ष्यावर अन्याय होतोय. सर्व पक्षी समुद्रकिनारी जमले आणि चोचीतून पाणी घेऊन दूर टाकू लागले. समुद्रातले मासे हा उपक्रम पाहून घाबरले. खरंच पक्ष्यांनी समुद्र कोरडा केला तर आपली खैर नाही. त्यांनी समुद्राकडे याचना केली. समुद्राला सुध्दा मग माघार घ्यावी लागली आणि अंडी परत करावी लागली."


अलका पटकन म्हणून गेली, "सर, चमत्कार!"

सर हसले.


वैभव म्हणाला, "सर, पण ससा कशी करेल सिंहाची शिकार?"

सर वैभवला म्हणाले, "इथे ससा म्हणजे कमकुवत व्यक्ती, अर्थात अशी व्यक्ती जी स्वतःला कमकुवत समजते. सिंह म्हणजे बलशाली व्यक्ती. हे प्रतिकात्मक आहे वैभव. असा विचार कर की  दृढनिश्चय आणि एकी असेल तर काहीही शक्य आहे. मग कोणीही कोणालाही हरवू शकतं.

कोणाला कमी लेखायचं नाही. स्वतःला तर मुळीच नाही. मग नक्की घडतात चमत्कार!


- वरुण भागवत


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...