Skip to main content

असाही योग (अयोग्य) दिवस!

A click by: Omkar Unde


किस्सा असा झाला की कोण्या एका ‘योग’दिनी बाहेर पाऊस पडत होता.
मी पावसापाण्यात पण धावत पळत एका इप्सित स्थळी पोचलो.
आत पोचलो तर छान वातावरण निर्मिती झाली होती.
आंतरराष्ट्रीय योग दिवस असल्याने सगळी तयारी झाली होती. मोठमोठी मंडळी मांड्या ठोकून खालीच बसली होती.
मी ही सहभागी झालो.
म्हणलं चला.. योगा करू!

 

आधी lecture सुरू झालं..
सुरुवात थेट भजी च्या उदाहरणाने झाली.
आधीच पाऊस, त्यात भजी.. ह्म्म ...
पण झालं वेगळंच..
ते म्हणाले की या वातावरणात भजी खावी वाटते..
मी मनात म्हणलं खरंय ..
तर ते म्हणाले .. अजिबात खायची नाही.. ताबा असला पाहिजे जिभेवर..
मी म्हणलं तो ताबा बोलताना ठीक आहे पण भजी म्हणजे.. पण त्यांच्या या वाक्याने भजीची आशाच संपली.

मग ते म्हणाले माणसाचं आयुष्य ५०% सुख आज ५०% दुःख असं असतं.

मी म्हणलं बरं .. भजी खायला मिळत नाही म्हणजे एकूणच ५०% दुःखाचा काळ चालू आहे.

मग 'सुख' मिळविण्यासाठी आमच्या केंद्राला भेट द्या असं ते म्हणाले.. तिथे ताण घालवला जाईल. अहो.. योगाच्या ऐवजी lecture सुरू झाल्याने निम्मे लोक अपेक्षाभंगाने वैतागले होते आणि तणावाखाली आले होते की हे काय चाललंय.. पण ते चालूच होतं.

गर्भसंस्कार पण केले जातील म्हणले. तसं कोणी असेल तर सांगा.
(घ्या. म्हणजे यांच्या session साठी गर्भवती स्त्रिया शोधणं आलं किंवा त्यांनी गर्भवती होणं आलं!)


लहान मुलांना फार स्ट्रेस असतो म्हणले ते! दप्तराच्या ओझ्यापासून ( आम्ही शाळा शिकलोच नाही ना आणि दप्तर पण नेलं नाही ना!)

नाही, या stress management मध्ये मुलांच्या दप्तराचा विषय आलाच कुठून??

माझ्या पायांमध्ये नुसताच मांड्या घालून स्ट्रेस वाढत होता. व्यायाम सुरूच होत नव्हते.

मग मेंदूविषयी बोलणं सुरु झालं.
आजपर्यंत मला २ मेंदूंबद्दल माहिती होती.
आज त्याहून जास्त मेंदू आहेत हे कळलं.
मग मला ज्ञान कमी आहे असं वाटून माझा स्ट्रेस वाढला.

मग देव आहे की नाही ही चर्चा!
(मी म्हणतो त्या देवाला कशाला त्रास.. आपण काही मागू नाही.. आणि तो काही उगाचच काही वाटत सुटणार नाही. त्याला उगाच कशाला discussion मध्ये ओढायचं ?)


मग पुरुष आणि स्त्री चा स्पर्श आणि त्यामागील हेतू या विषयी सुरु झालं..
(पण आत्ता कोणीच कोणाला touch करत नव्हतं.. फक्त  मांडी घातल्याने मांड्यांचा स्पर्श झाला असेल फार तर फार.. तो ही स्वतःचाच स्वतःला! आणि मुळात योगाशी याचा काय संबंध!)


आधी म्हणले रागावर नियंत्रण हवं पण मग म्हणे राग काढलाच पाहिजे नाहीतर स्ट्रेस वाढेल. हे असं ऐकून आता मला राग येत होता पण राग काढला तर मी वाईट आणि नाही काढला तर स्ट्रेस वाढणार! मग शांत बसलो. वाढू दे स्ट्रेस .. काय करणार!

माणसं उठून जात होती.
मी बसून राहिलो.
माणसं वैतागत होती.
मी त्यांचं वैतागणं पाहत होतो.

मग अचानक स्ट्रेस वाढला कारण २५ मिनिटं झाल्यावर ते म्हणाले आपण एकच तासात संपवू!
(अजून तब्ब्ल ३५ मिनिटं दुःख.. दुःखाचे ५०% आजच संपणार बहुतेक..)


एकतर सुंदर पदार्थांची उदाहरणं वाढतच होती पण त्यातलं खायला काहीच नव्हतं. त्यात योगदिवस असल्याने त्या वेळी कडेला बशीत काही तरी घेऊन खावं तर ते ही बरं दिसत नाही.

या सगळ्या विचारात आणि ताणात बराच वेळ सरला.

अखेर तो क्षण आला.
दुःख संपून माझे राहिलेले ५०% सुख मिळविण्याचा.. अर्थात lecture संपण्याचा!

हो हो..  Lecture खरंच संपलं..
माझा विश्वास बसत नव्हता..
पण हे खरं होतं..
ताण हळूहळू सरत होता..
सुखपहाट आली होती.. छे.. पहाट कसली..
सगळं संपेपर्यंत पार संध्याकाळ झाली.

त्यांना सांगावंसं वाटलं अशा दिवशी असं करू नका. पण मी शिकलो होतो..  रागावर आणि जिभेवर नियंत्रण!!
रागावर ठेवलं मी नियंत्रण.. पण जिभेवर ठेवणं शक्य नव्हतं.. कारण अजूनही पाऊस पडत होता आणि तिथून बाहेर पडताच भजीचा वास मला खुणावत होता. सुखाचा काळ खरंच जवळ येत होता.

-वरुण भागवत


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...