Skip to main content

तुझ्या कर्माने मर...

A Click by: Varun Bhagwat


राजाचे दोन सेवक सोमू आणि चंदू राजाच्या अन्यायाला वैतागले होते. सोमू म्हणाला, “काही माणसांनी कितीही भ्रष्टाचार केला, कसेही वागले, कोणाचं काही वाईट केलं, तरी त्यांचं काही वाईट होतंच नाही.”

“तू कशाला त्यांच्या वाईटावर आहेस पण?”

“नसावं का?”

“असावं का?”

“वाईट माणसांचं चांगलं व्हावं वगैरे असा विचार मी करू शकत नाही.” सोमू जवळजवळ चिडतच म्हणाला.

“मी कुठे म्हणतोय असा विचार कर.” चंदू शांत होता.

“तू स्पष्ट बोल.”

“मी म्हणतोय की त्यांचं चांगलं व्हावं हा विचार नको करूस पण वाईट व्हावं असा सुद्धा विचार करू नकोस.”

“कालपर्यंत राजाचं वाईट चिंतणारा तू आज एकदम असं बोलतोस तेव्हा मलाच आश्चर्य वाटतं.” सोमू बोलून गेला.

“किस्साच तसा घडलाय म्हणून मी हे बोलतोय.” चंदू सांगत होता.

“नेमकं काय घडलंय?” सोमूने विचारलं.

चंदू सांगू लागला, “अरे काल राजा नेहमीप्रमाणे शिकारीला गेला. पण जंगलाकडे जाताना वाटेवर भलतंच घडलं. आपल्या राजाला कारण नसताना दुसऱ्याला त्रास देणं फार आवडतं. सोबत असणाऱ्या सेवकाची तो क्रूर थट्टा करत होता आणि मजा घेत होता. थोडं पुढे गेल्यावर त्याने एक झाड शोधलं आणि झाडावर जाऊन शिकारीची वाट पाहत बसला. राजाने खाली पाहिलं तर एक कुत्रा कारण नसताना एका सश्याला छळत होता. बिचारा ससा घाबरून बिळाकडे परतू लागला. मात्र कुत्रा पाठ सोडेना. सश्याची थट्टा करता करता कुत्र्याने एक फटका त्याला मारला. ससा बिळात शिरला पण त्या फटक्यामुळे त्याच्या कानाला इजा झाली. तेवढ्यात एक माणूस तिथून जात होता. माणसाच्या रस्त्यात हा कुत्रा येत होता. म्हणून माणसाने एक दगड उचलला आणि कुत्र्याला मारला. कुत्रा केकाटत तिथून निघून गेला. राजासोबत आलेल्या सेवाकांपैकी एकाचा घोडा मनमानी करू लागला आणि सुसाट सुटला. त्याच्या वाटेत तो कुत्र्याला दगड मारणारा माणूस आला आणि घोडा त्या माणसाला जोरात धडक मारून गेला. माणसाच्या कंबरेत त्या घोड्याची लाथ बसली नि माणूस जागेवर गप्प बसला. तो घोडा बेभान होता. त्याचा स्वत:वर ताबा राहिला नव्हता. तो थेट समोरच्या एका झाडाला जाऊन धडकला. त्याला चांगलीच दुखापत झाली. राजा हे सारं पाहत होता. अचानक आकाशवाणी झाल्यासारखा आवाज त्याच्या कानावर आला, “राजा, तू तुझ्या कर्मानेच मरणार.” राजाचा विचार अचानक बदलला. तो क्षणार्धात झाडावरून खाली उतरला. उतरता क्षणी मोठा आवाज झाला. राजाने पाहिलं तर तो झाडावर ज्या जागी बसला होता तिथे वरतून एक मोठ्ठा दगड येऊन पडला होता. राजा थोडक्यात बचावला होता.” चंदू बोलता बोलता थांबला.

“अरे बाप रे, खरंय. प्रत्येक जण आपल्या कर्माने मरतो. म्हणून राजाने आज सर्वांशी संवाद साधायचा असल्याची घोषणा केलीये तर. काय बोलायचं असेल राजाला? ” सोमू विचारपूर्वक म्हणाला.

“आजपर्यंत केलेल्या अन्यायाची माफी मागायची असेल.” चंदू उत्तरला.

“तुला कसं माहित पण हे सगळं?” सोमूने विचारलं.

“मी उल्लेख केल्याप्रमाणे शिकारीला जाताना राजा ज्या सेवकाची थट्टा करत होता तो सेवक मी होतो. “तू तुझ्याच कर्माने मर!” ही राजाला जी आकाशवाणी वाटली ती आकाशवाणी नसून राजा ज्या झाडावर बसला होता त्या झाडापेक्षा अजून एका उंच झाडावर चढून मी बसलो होतो, राजाला मारायच्या हेतूनेच. पण जे राजाने पाहिलं तेच मी पण पाहिलं... जो तो आपापल्या कर्माने मरत होता.” चंदूने खुलासा केला.

 सोमू चंदूला म्हणाला. “खरं आहे. पण एक प्रश्न राहतोच. चंदू, तू मारलेल्या दगडाचा नेम चुकून चुकला की मुद्दाम चुकवलास?”

-       वरुण भागवत   

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...